Saturday, 21 March 2020

मृत्यु दाराशी येता......

श्वासाचे गणित मांडूया ......
            अनेक msg चा धुमाकूळ...म्हणजे कोरोना जेवढ्या लवकर replicate होत नसेल त्यापेक्षा लवकर msg चा फॉर्म बदलत आहे. विनोद, विनंती, आवाहन, समज, दाखले, आदेश, स्वतःच ideal role होणे, स्वनिर्मिती  अशा एक ना अनेक स्वरुपात माणसाची प्रगल्भता दिसून येत आहे. कधी ना कधी मरण येणार.... प्रत्येकजण यासाठी so called mentally prepared असतो. अज्ञानात सुख असते. क्षण कोणता असेल माहित नाही. 
            आत्ताची परिस्थिती फक्त तो क्षण कदाचित हा असू शकतो ....असे सांगणारी आहे. हे वर्ष तसे असे क्षण अनेकदा दाखवून देणारे होते. पावसाळ्यातील पूर परिस्थिती असो, ऑस्ट्रेलिया मधील वणवा असो किंवा वूहान मध्ये जन्माला आलेला आणि सर्व जगाने पोसलेला हा कोरोना असो. हे क्षण वरचेवर आले आहेत आणि या क्षणामधून निभावलो तर पुढे असे अजून क्षण असतील. क्षण चुकणार नाहीये... सासऱ्यांनी सांगितलेली एक गोष्ट आहे .. गरुडाच्या पाठीवर एक मुंगी क्षण चुकवायला हिमालयात गेली होती. नंतर समजले तिचे मृत्यूचे स्थानच हिमालय होते. 
      तरीही लढा द्यायचा आहे. हतबलता स्वीकारायची नाहीये. सगळ्या शास्त्रज्ञाच्या मांदियाळीत मला डार्विन नेहमीच भावतो. कोणतेही आयुष्य जगत असा त्याची Theory of Natural Selection प्रत्येक ठिकाणी लागू. Struggle for existence and Survival of fittest. तावून सुलाखून जो निघतो तो सर्वोच्च पदी जातो आणि टिकतो. त्याची पिढी टिकते.
            सध्याची लढाई केवळ स्वतः टिकण्याची नाहीये तर पिढीला टिकविण्याची आहे. कथारूप वाटणारे आपले आईवडिलांचे अनुभव....७२ चा दुष्काळ पडला होता ना तेव्हा....किंवा चीन भारत युद्ध असो किंवा बांग्लादेश युद्ध असो त्यांचे अनुभव “आम्ही कसे दिवस काढले”....या tagline ने सूरू होतात आणि आपल्याला ते कथारूप वाटून आपण त्यात रमतो. आज ही tagline “आपल्याला असे दिवस काढायचे आहेत”..... या मध्ये रुपांतरीत झाली आहे. काही वर्षांनी नक्कीच ती कथारूप होईल पण ती कथा सांगायला आपण असू की नाही याची शाश्वती नाहीये....
            मज्जा अशी आहे की मरण हे परीक्षा घेत असते. यावेळेस दाराशी आलेले हे मरण थोडेसे विक्षिप्तपणे वागत आहे. मरणच ते थोडा विक्षिप्तपणा असणार.... मरणाचा लढा वगैरे बघून आता त्याला सुध्दा बहुतेक बोअर झाले आहे. त्याला आता मानवाचा त्रागा बघायची इच्छा नाहीये. ती धावपळ, ओढाताण, स्ट्रेस, हेवेदावे, हे सगळ बघून त्यालाच frustration आले आहे बहुतेक. म्हणून त्याने आ वासला आहे..... आई जशी मुलांना म्हणते ना एका जागी स्थिर बैस नाहीतर माझ्या इतकी वाईट नसेल.... मरण सध्या त्या फॉर्म मध्ये गेले आहे. म्हणत आहे की फक्त एका जागी शांत बस.....फक्त शांत बस.... त्याला सुध्दा कामातून जरा विश्रांती हवी आहे. accidents, वासना, स्ट्रेस, प्रदूषण कित्ती कित्ती कारण या मरणाची! सध्याची परिस्थिती बघून कोरोना शिवाय बाकीची मरणाची कारण होती की नाही कधी हा प्रश्न पडावा......
            LOCKDOWN ! काय lock down झाले आहे नेमकं? अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. बातम्यांमध्ये एक ओळ दिसते. फक्त जीवनावश्यक वस्तू सूरू राहतील.... जीवनावश्यक.... मग हाताच्या बोटावर मोजण्याइतकी दुकाने. तिथे सुद्धा आता १५ मिनिटापेक्षा जास्त नको थांबायला....काय आहे माझ्या जीवनासाठी आवश्यक ? हे शोधण्याचा हा सामुदायिक काळ.... कदाचित सगळ्यांना एकत्रितपणे आणि एकच उत्तर मिळाले तर उरलेले आयुष्य (अजूनही..आशानाम मनुष्याणां....)सुखकर होईल.
            आपलीच पिढी आहे जी ही कथा पुढच्या पिढीला सांगताना त्याला अध्यात्माची योग्य जोड देऊ शकेल. आज तंत्रज्ञान नसते तर ही जागृती करणेही सोप्पे नव्हते. त्यामुळे तंत्रज्ञानापासून दूर असलेले आज अनेकजण त्याचा वापर करून Social distancing मध्ये पण आपलेपणा शोधताना दिसत आहेत. आणि नेमके कशासाठी पळत आहोत याचा विचार सुध्दा करायला वेळ नसणारे आज जरा स्थिर होता येत आहे का किंवा आपल्याला सुध्दा स्थिर होता येऊ शकत या विचाराने अचंबित आहेत.
            जरा विसावू या वळणावर ...असं म्हणत असताना थोडा लेखाजोगा मांडू या का? मित्रमंडळीमध्ये आपण काय काय करत असतो, काय काय केले, कसं कसं करत आहोत, असं अगदी न थकता सांगत असतो. हा लेखाजोगा जरा स्वतःला सांगू या....खरंच डार्विनच्या सिद्धांतानुसार जगलो का मी .... जो जो काही struggle होता तो माझ्या अस्तित्वासाठी होता का .... काय राहून गेलं ...एक ब्रेक मिळाला आहे ..त्यात ते पूर करता येइल का? आत्तापर्यंत करत असलेलं सगळच निरर्थक का....की त्याचे या समाजात किती योगदान देता आले या सगळ्याचाच लेखाजोगा मांडू या.
            break हवा break हवा असं म्हणत असताना नवेनवे destination शोधत असतो. निसर्गाने आज कदाचित जाणीव करून दिली....तुझ घरपण एक destination आहे. तिथे सुद्धा नवरसाची विविध रूपे आहेत. त्यांना पण जरा अनुभव. आणि तू स्वतः या निसर्गाचा घटक आहेस. स्वतःला अनुभव. तुझ्यामधले सौंदर्य शोध. आणि ते फक्त स्वतःला सांग....
            मृत्यु दाराशी येता एवढा शांत संवाद तुझ्यामधील ईश्वराशी करता येत असेल तर त्याशिवाय दुसरं सुख काय..... भेटूच....या अशा कथा सांगायला...यया बद्धा प्रधावन्ति.......


11 comments:

  1. खुपच छान लेख ता

    ReplyDelete
  2. सुंदर विचार आणि शब्दांकन, अजून वाचायला आवडेल

    ReplyDelete
  3. व्वा,खरच अंतर्मुख करणारा आहे तुझा लेख.

    ReplyDelete
  4. Smita.... kiti deep conversation ahe he... salute to your thought process!

    ReplyDelete
  5. Apratim. Khup chhan vichar mandla ahes ga

    ReplyDelete
  6. smita khup chan lekh .antarmukh karun swa shodhnare apratim lekhan.

    ReplyDelete
  7. smita khup chan lekh .antarmukh karun swa shodhnare apratim lekhan.

    ReplyDelete
  8. smita khup chan lekh .antarmukh karun swa shodhnare apratim lekhan.

    ReplyDelete