Sunday, 26 January 2020

अनघाईचे अमोघ वर्चस्व

       
याची देही याची डोळा.........

         खूप  दिवस लिखाणाची बैठक जमून येतच नव्हती. त्याबाबत रुखरुख होती. कारण मात्र उमगत नव्हते. आज मात्र कधी एकदा लिहायला घेत आहे असे होऊन गेले. त्याबरोबर कारणही उमगले... आयुष्यात sort of  भारी, remarkable अनुभव गाठीशी आले की या लेखनाला पर्याय नाही.
         मन वज्र हवे मनगट ते पोलाद....कधीही शांत बसले की ही ओळ मला नेहमी आठवते. फार आत्मीयता वाटते ह्या वाक्याविषयी. मनात खूप इच्छा आकांक्षा दाटून येतात. केलं पाहिजे असं काहीतरी...अशी यादी तयार होते आणि मग शरीर मध्येच एखादा break लावते आणि म्हणते जरा दमानं घ्या. मन सातासमुद्रापलीकडे गेलेलं असतं आणि त्याच्या धावण्याच्या वेगाबरोबर शरीर धावू शकलं नाही की कुठेतरी आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो. पण ...एखादा अनुभव असा घडतो की आपल्या आत्मविश्वासाला उभारी देतो... अनघाई च्या त्या घळीमध्ये हेच घडले.....
           २०१९-२० ची प्रबोधिनीत राबविली गेलेली दुर्गजागर मोहीम.दहा महिन्यात ३० किल्ले सर करण्याचा संकल्प सोडलेले इयत्ता सातवी ते नववीचे ४० सवंगडी आणि त्यांना संकल्पप्रत पोहचविणारे सेनापती ....असे सगळे जण संकल्प पूर्तीसाठी अनघाई गडावर जाणार होते. कठीण श्रेणीतील गड, खडकांचा बनलेला. रोपच्या सहाय्याने चढाई , शेवटच्या ट्रेकच्या पुर्ततेने मोहिम पूर्ण करण्याचं साकड असे कितीतरी छोटे छोटे घटक या ट्रेकशी जोडलेले होते. त्यात माझे या ट्रेक वर जाणे ठरले...दररोजचा (केवळ म्हणायला)जुजबी व्यायाम आणि सुदर्शन क्रिया एवढीच तयारी...स्वतःला टेस्ट करून घे असे आमच्या अहोंचे सांगणे....जमेल हा विश्वास....एवढ्यावर शाळेत पोहचले....
           ट्रेक चे सरसेनापती निलेश दादा गावडे यांना मला बघून नमस्कार करताना त्यांच्या मनात नव्याने calculation सूरू झाले असल्याचे लक्षात आले.(महाराष्ट्रातील सर्व ट्रेक करणारी, गड किल्ल्यांच्या प्रेमात असलेली ही व्यक्ती..... गाव सांगितले की डाव्या उजव्या बाजूंला कोणते गड याची चालती बोलती dictionary....गडांचा गूगल map...sorry गावडे map) शीतल ताईच्या चेहऱ्यावर समाधान..आज गप्पा होतील छान असे दोघींना वाटले... शीतल ताई म्हणजे दुर्गजागर ची शीतल दुर्गा.. सर्व ट्रेक हिरीरीने पूर्ण करणारी जिद्दी महिला पालक ....सर्व ट्रेक मधील सर्वांची आई ... सर्व ट्रेक अवघड म्हणून सागर माथाचे प्रशिक्षक सोबतीला ..... असा सर्व लवाजमा बरोबर घेऊन शिवराज दादांनी जय श्रीराम आरोळी दिली आणि प्रस्थान झाले...
          मी अजूनही संभ्रमात.....त्यात सागरमाथा चे समन्वयक प्रशांत पवार यांच्या गिर्यारोहणाच्या कामाविषयी मुलाखत सूरू झाली. नशा, वेड काय असते हे या जिप्सी लोकांमध्ये जाणवते...मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी गडाच्या टोकावर शेकडो वेळा जाण्याची तयारी दाखविणारी ही मंडळी... आणि आपण आज ३ round मारले आणि १२ मजले चढले म्हणून कौतुकाने स्टेप्स मोजणारी मंडळी...आपलीच आपल्याला जाणीव व्हावी....गावडे दादांना विचारले ...मी mentally किती आणि कशासाठी prepare होऊ.... ते मला म्हणाले ..ट्रेक पूर्ण होणार..करणार...(all)आल is well...म्हटले ok.
             माझा एकंदरच आविर्भाव बघून दादाने काळजीपोटी (केवळ दया येऊन) त्याचा shooter शौनक राउत मला दिला....'हा दिला आहे..ट्रेक पूर्ण झालाच पाहिजे'..शौनक नववीचा विद्यार्थी...वर्गात शिक्षक म्हणून गेलो की आपण विद्यार्थ्यांना धडा शिकवतो... शौनक काय चीज आहे हे मला काल समजले...त्याने मला ट्रेक शिकवला..त्याने मला सेवाभाव शिकवला...त्याने मला निसर्ग शिकवला. एकोणतीस किल्ल्यात गडी काय ताकदीचा मावळा झाला आहे हे मला उमगले. एवढी सोबत केल्यानंतर त्याचे एक वाक्य होते...आज मला माझ्या क्षमता समजल्या...

          वर्षभर मुलांबरोबर वर्गात असायचे...पण काल मुले माझ्याबरोबर होती. खूप मजा मस्ती, गप्पा....त्यांची तिथे धडा शिकण्याची तयारी ....मलाच भारी वाटत होती... एकेकाचे एकेक रंग दिसत होते.... मैत्री तर झालीच पण wavelength जुळली...जी healthy communicationसाठी सगळ्यात गरजेची असते...हे सगळं पदरी पाडत गड चढाई सुरूच होती...माझे नाव खेळगट (धन्यवाद तरस साहेब)....लिंबू टिंबू याअर्थी...शेंडेफळ झाले होते सर्वांचे... माझ्या speed ने जात होते, थांबत होते....पण हळूहळू लक्षात येऊ लागले की ससा कासवाच्या शर्यतीतील मी कासव होत आहे...मस्त मजा घेत होते...सरसेनापती रघु दादांना तर माझे नाव असे असे आहे असे आवर्जून सांगावे लागले...म्हटले उद्या शाळेत येऊन विचाराल नाहीतर खेळगट कुठे म्हणून..
           मुलांचा आता एकमेकांवर किती जीव जडला आहे हे जाणवत होते.
          सगळे सेनापती म्हणजे.... त्यांनी आज्ञा करावी आणि मुलांनी झेलावी... सेनापतींनी मावळे बनून राहण्याचा प्रयत्न करावा....मुलांची आईवडिलापेक्षा अधिक काळजी घ्यावी....प्रेरणा द्यावी.... मला मात्र मनोमन आधीचे किल्ले का  मिस केले याची जाणीव व्हावी..विचाराबरोबर पाऊले पडत होती...चैतन्याने परिपूर्ण भरलेली माणसे आजूबाजूला होती...सागरमाथा टीमला बघून तर ... अरे बाप लोकं! ज्या ठिकाणी रोप ची गरज त्या ठिकाणी ही लोक चटचट चढाई करून खुंटे ठोकणार...आपल्याला एकट्याला चढायचे tension..हे आपल्याला आपल्या सामानासकट उचलणार..तेही सुरक्षित...ग्रीप कुठे कुठे याचे नकाशे त्यांच्या मनात कोरलेले .... त्याच वाटेवरून दहा वेळा चढाई उतराई करणार...किती ते नियोजन...मधमाश्या उठतील ..उठल्या..पाच मिनिटे शांत राहा...जणू मधमाश्यांच्या नसनस से वाकीब...
          जसजसे चढण चढत होते तसतसे खेळगट आता पुढच्या इयत्तेत जात होता...विद्यार्थी शिक्षकांना प्रेरणा देतात... वर्गात यांची ऊर्जा बंदिस्त असते...रुसो, रवींद्रनाथ यांची शिक्षण प्रणाली डोळ्यासमोर दिसत होती...मुलांना निसर्गाच्या सानिध्यात सोडा ..निसर्ग त्यांना घडवेल..विद्यार्थी अनुभवल्याच समाधान मनात कोरले गेले होते. मिश्किली करणारा ध्रुव, धड्यामधील शंका तिथे विचारणारे कैवल्य,सुयश, शार्दुल , मिस मला रडायला येत नाही पण भरून येत आहे असे म्हणणारी सिद्धी, कितीही थांब म्हटले तरी रडायचे न थांबू शकणारी प्रांजल, मानसी, आभा, मृदुला, सतत पडणारी आणि सगळ्याचे चिडविण्याची जागा असणारी तनिष्का कोणाकोणाला आठवू... कशाला आठवू ..माझे झाले आता सगळे.. मजा येइल आता ...
        बरं...... यादरम्यान अजून चढाई चालूच आहे बर का.... आणि तो ८०  अंशाचा खडक आला...आणि मुलांना साधा ८० अंशाचा कोन काढता येत नाही का हे म्हणणे निरर्थक वाटू  लागले... मुलांना ८० अंशाचा कोन, खडक सहज चढता येत होता...वरती जाऊन काय करायचे ? बघायला काही नाही ... म्हटले गप इथे बसा..चढू शकलो तरी..उतरायचे आहे हे विसरून चालणार नाही...पण एकटे खाली रहायचे म्हणजे नुकताच सापाचा सुंदर photo पाहिला असल्याचे लक्षात आले आणि म्हटले असे ही मरायचे आणि तसे ही...तो कुछ तुफानी करते है! आणि ८० अंशाचा खडक चढले...वरती पोहचले आणि गावडे दादा आणि रघु दादांना नमस्कार केला. त्यांचे उत्तर घरी पोहचल्याशिवाय ट्रेक पूर्ण होत नसतो... आमचे ११ नियम आहेत. "धन्य" म्हणाले!


         संकल्पपूर्तीनिमित्त गडाच्या साक्षीने मुलांना ढोल गजराच्या आवाजात उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. याचा सगळा पाठपुरावा सतीश पवार साहेबांचा ...एकेक भन्नाट कल्पना सुचणारे मोहरे या निमित्ताने भेटले...  बाजूने सह्याद्रीच्या रांगा... केवळ नतमस्तक... काहीच नाही आपण ...काहीच नाही....ह्या महाराष्ट्रात सह्याद्रीचे बिनदिक्कत वर्चस्व .... पुण्यातील सुभेदारी जणू अनघाईकडे असावी असा त्याचा रुबाब...सौंदर्य तरी किती असावे... अजिबात हिरवाई नाही... दोन चार पूर्णपणे पर्णहीन झाडे रुबाबात उभी असावी...सेल्फीप्रेमीसाठी सेल्फी spot करून...

        चला आता परतीचा प्रवास... तीच सोबत...पण गवसणी घातल्याचे समाधान...त्या निसर्गाला धन्यवाद म्हणून आलो तरी त्याच्या ऋणातून उतराई न होण्याची जाणीव...खूप श्वास भरून घेतला... खूप श्वास.... जमेल म्हणत असतानाचा भूतकाळ आणि जमलेच चा वर्तमान transition phase दाखवत होता.. चढाई पेक्षा उतरण अवघड होती... पण सोबत तिथे भरून घेतलेला श्वास होता... सगळ्यांचे शेंडेफळ होते म्हणून Z PLUS सुरक्षा होती. म्हणून तेही जमलेच... बोटे मी मी म्हणत होती. २६ जानेवारीची ध्वजारोहण वेळ दिसत होती....काय करायचे.... आल is well म्हणायचे.... गरम पाण्याची कुंडे मदतीला धावून आली... त्या डुबकीने मी ट्रेक केला की नाही हेच शरीराला विसरायला लावले आणि पूर्वीची स्मिता दिली....चमत्कार निसर्गातच घडतात...सगळ्याच्या मनापासून मिळणाऱ्या शुभेच्छा गाठीशी असल्याकी असे आनंदाचे क्षण आयुष्यात निर्माण होतात....याची देही याची डोळा त्याचे साक्षात्कार मिळतात....
          शेवटचा टप्पा आता...सर्वजण रडवेले झाले.. तीस ट्रेक मध्ये हसवणारे डाके साहेब असे रडवू कसे शकतात? पण दादाने दिलेल्या या अनुभवामधून , या मित्रामधून दूर जाणे त्यांना जमतच नव्हते..सगळ्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. जणू काही त्या सह्याद्रीचे पायच धुतले..
        शाळेत आल्यानंतर मुलांच्या पालकांनी केलेलं स्वागत, आपलं बाळ लढाई करून आलेलं नाही तर आता लढाईसाठी सिद्ध झाल्याच समाधान आणि शिवराज दादाला त्यांच सांगण की, 'याची उतराई कशी करू?' हे सगळच कल्पनातीत होत. याची देही याची डोळा किती ते साठवावं... फक्त आणि फक्त नतमस्तक व्हावं.. धन्यवाद म्हणावं...