Saturday, 21 March 2020

मृत्यु दाराशी येता......

श्वासाचे गणित मांडूया ......
            अनेक msg चा धुमाकूळ...म्हणजे कोरोना जेवढ्या लवकर replicate होत नसेल त्यापेक्षा लवकर msg चा फॉर्म बदलत आहे. विनोद, विनंती, आवाहन, समज, दाखले, आदेश, स्वतःच ideal role होणे, स्वनिर्मिती  अशा एक ना अनेक स्वरुपात माणसाची प्रगल्भता दिसून येत आहे. कधी ना कधी मरण येणार.... प्रत्येकजण यासाठी so called mentally prepared असतो. अज्ञानात सुख असते. क्षण कोणता असेल माहित नाही. 
            आत्ताची परिस्थिती फक्त तो क्षण कदाचित हा असू शकतो ....असे सांगणारी आहे. हे वर्ष तसे असे क्षण अनेकदा दाखवून देणारे होते. पावसाळ्यातील पूर परिस्थिती असो, ऑस्ट्रेलिया मधील वणवा असो किंवा वूहान मध्ये जन्माला आलेला आणि सर्व जगाने पोसलेला हा कोरोना असो. हे क्षण वरचेवर आले आहेत आणि या क्षणामधून निभावलो तर पुढे असे अजून क्षण असतील. क्षण चुकणार नाहीये... सासऱ्यांनी सांगितलेली एक गोष्ट आहे .. गरुडाच्या पाठीवर एक मुंगी क्षण चुकवायला हिमालयात गेली होती. नंतर समजले तिचे मृत्यूचे स्थानच हिमालय होते. 
      तरीही लढा द्यायचा आहे. हतबलता स्वीकारायची नाहीये. सगळ्या शास्त्रज्ञाच्या मांदियाळीत मला डार्विन नेहमीच भावतो. कोणतेही आयुष्य जगत असा त्याची Theory of Natural Selection प्रत्येक ठिकाणी लागू. Struggle for existence and Survival of fittest. तावून सुलाखून जो निघतो तो सर्वोच्च पदी जातो आणि टिकतो. त्याची पिढी टिकते.
            सध्याची लढाई केवळ स्वतः टिकण्याची नाहीये तर पिढीला टिकविण्याची आहे. कथारूप वाटणारे आपले आईवडिलांचे अनुभव....७२ चा दुष्काळ पडला होता ना तेव्हा....किंवा चीन भारत युद्ध असो किंवा बांग्लादेश युद्ध असो त्यांचे अनुभव “आम्ही कसे दिवस काढले”....या tagline ने सूरू होतात आणि आपल्याला ते कथारूप वाटून आपण त्यात रमतो. आज ही tagline “आपल्याला असे दिवस काढायचे आहेत”..... या मध्ये रुपांतरीत झाली आहे. काही वर्षांनी नक्कीच ती कथारूप होईल पण ती कथा सांगायला आपण असू की नाही याची शाश्वती नाहीये....
            मज्जा अशी आहे की मरण हे परीक्षा घेत असते. यावेळेस दाराशी आलेले हे मरण थोडेसे विक्षिप्तपणे वागत आहे. मरणच ते थोडा विक्षिप्तपणा असणार.... मरणाचा लढा वगैरे बघून आता त्याला सुध्दा बहुतेक बोअर झाले आहे. त्याला आता मानवाचा त्रागा बघायची इच्छा नाहीये. ती धावपळ, ओढाताण, स्ट्रेस, हेवेदावे, हे सगळ बघून त्यालाच frustration आले आहे बहुतेक. म्हणून त्याने आ वासला आहे..... आई जशी मुलांना म्हणते ना एका जागी स्थिर बैस नाहीतर माझ्या इतकी वाईट नसेल.... मरण सध्या त्या फॉर्म मध्ये गेले आहे. म्हणत आहे की फक्त एका जागी शांत बस.....फक्त शांत बस.... त्याला सुध्दा कामातून जरा विश्रांती हवी आहे. accidents, वासना, स्ट्रेस, प्रदूषण कित्ती कित्ती कारण या मरणाची! सध्याची परिस्थिती बघून कोरोना शिवाय बाकीची मरणाची कारण होती की नाही कधी हा प्रश्न पडावा......
            LOCKDOWN ! काय lock down झाले आहे नेमकं? अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. बातम्यांमध्ये एक ओळ दिसते. फक्त जीवनावश्यक वस्तू सूरू राहतील.... जीवनावश्यक.... मग हाताच्या बोटावर मोजण्याइतकी दुकाने. तिथे सुद्धा आता १५ मिनिटापेक्षा जास्त नको थांबायला....काय आहे माझ्या जीवनासाठी आवश्यक ? हे शोधण्याचा हा सामुदायिक काळ.... कदाचित सगळ्यांना एकत्रितपणे आणि एकच उत्तर मिळाले तर उरलेले आयुष्य (अजूनही..आशानाम मनुष्याणां....)सुखकर होईल.
            आपलीच पिढी आहे जी ही कथा पुढच्या पिढीला सांगताना त्याला अध्यात्माची योग्य जोड देऊ शकेल. आज तंत्रज्ञान नसते तर ही जागृती करणेही सोप्पे नव्हते. त्यामुळे तंत्रज्ञानापासून दूर असलेले आज अनेकजण त्याचा वापर करून Social distancing मध्ये पण आपलेपणा शोधताना दिसत आहेत. आणि नेमके कशासाठी पळत आहोत याचा विचार सुध्दा करायला वेळ नसणारे आज जरा स्थिर होता येत आहे का किंवा आपल्याला सुध्दा स्थिर होता येऊ शकत या विचाराने अचंबित आहेत.
            जरा विसावू या वळणावर ...असं म्हणत असताना थोडा लेखाजोगा मांडू या का? मित्रमंडळीमध्ये आपण काय काय करत असतो, काय काय केले, कसं कसं करत आहोत, असं अगदी न थकता सांगत असतो. हा लेखाजोगा जरा स्वतःला सांगू या....खरंच डार्विनच्या सिद्धांतानुसार जगलो का मी .... जो जो काही struggle होता तो माझ्या अस्तित्वासाठी होता का .... काय राहून गेलं ...एक ब्रेक मिळाला आहे ..त्यात ते पूर करता येइल का? आत्तापर्यंत करत असलेलं सगळच निरर्थक का....की त्याचे या समाजात किती योगदान देता आले या सगळ्याचाच लेखाजोगा मांडू या.
            break हवा break हवा असं म्हणत असताना नवेनवे destination शोधत असतो. निसर्गाने आज कदाचित जाणीव करून दिली....तुझ घरपण एक destination आहे. तिथे सुद्धा नवरसाची विविध रूपे आहेत. त्यांना पण जरा अनुभव. आणि तू स्वतः या निसर्गाचा घटक आहेस. स्वतःला अनुभव. तुझ्यामधले सौंदर्य शोध. आणि ते फक्त स्वतःला सांग....
            मृत्यु दाराशी येता एवढा शांत संवाद तुझ्यामधील ईश्वराशी करता येत असेल तर त्याशिवाय दुसरं सुख काय..... भेटूच....या अशा कथा सांगायला...यया बद्धा प्रधावन्ति.......


Sunday, 8 March 2020

स्त्रीत्व की मनुष्यत्व ?

Hi….
जागतिक महिला दिनाच्या संध्येला....
भारी वाटतं ना ..आपल्याबद्दल कोणीतरी एवढं भरभरून लिहित आहे. कोणीतरी काय....सगळेचजण  अगदी सगळेचजण ...सगळ्यांच्या status ला स्त्री म्हणजे...मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व! सहनशील, त्यागी, प्रेम, वात्सल्य, झुळूक ....आई, बहीण, प्रेयसी, पत्नी .... एकेक साज चढत जातो. Being woman चे  एक सुंदर वलय निर्माण होऊ लागते. मग being woman की being human हा संघर्ष उगीचच मनात घोळू लागतो. कारण काहीच नाही... पण वाटू लागतं! वाटायला काय तसं काहीही वाटत !
Special treatment, special respect, द्या असं सांगायची गरज का निर्माण झाली असेल? निसर्गाच्या दोनच निर्मिती, कलाकृती  पुरुष आणि स्त्री. जगाच्या पाठीवर कोठेही जा .... पुरुष आणि स्त्री याच रचना बघायला मिळणार... तरिही स्त्रीची रचना, तिचं अस्तित्व जाणून घ्या हे सांगायची, नुसते सांगायची नाही तर त्यासाठी घाट घालण्याची गरज पडावी....टाहो फोडावा लागतो आमच्याकडे बघा.....त्यासाठी कामाची यादी द्यावी लागते आणि एवढेच नाही तर स्त्री पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगावे लागते... ही चढाओढ कशासाठी? एकाला सिद्ध करण्यासाठी दुसरा नेहमी दुसऱ्या स्तरावर का न्यावा लागतो? .... हा मला पडलेला साधा प्रश्न आहे...
मग हळूहळू उत्तर समजू लागते. स्त्रीचं अस्तित्व समजत नाही, लक्षात येत नाही असं नाही. तिचं अस्तित्व तिच्या बौद्धिक आणि मानसिक सामार्थ्यापेक्षा शारीरिक सामर्थ्याला जास्त प्राप्त आहे. नाजूकता, सौंदर्य, लज्जा, लोभस याचं वलय पूर्वापार तिच्या भोवती निर्माण झालेले आहे. सहनशील, त्यागी हे तिचे हातखंडे आहेत. कितीही वेळा आणि कधीही ती हे  करू शकते. ऐतिहासिक समाज या विचारांशी तद्रूप होता. काही कोष, काही विचार हे सोयीच्या राजकारणासारखे असतात. समजत असतं पण आम्हाला ते सोडायचे नसतात. सहज उपलब्ध असलेली  उपभोग्य अशी बाब कोणीही मनुष्य सहज सोडू शकणार नाही. तो एक मानवी स्वभाव आहे. त्यावर  प्रयत्नपूर्वक  काम करावे लागते. सध्या हा घाट प्रयत्नपूर्वक कामाचा आहे.
पण तरिही काही गोष्टी खटकत आहेत. मी स्त्री म्हणून मला ही सवलत हवी किंवा मला सहानुभूती दाखवा असा लेप या प्रयत्नास चढायला नको. सौंदर्य, नाजूकतेचे जे वलय झाले आहे ज्याच्या संरक्षणाची जबाबदारी may be ऐतिहासिक काळात पुरुषांनी उचलली होती आणि सरावाने ती मक्तेदारी झाली असावी. स्त्रीला आज हे पाश तोडायचे आहेत. 
केवळ माझ्यामध्ये हेच गुण नाहीत, तर वीरता, साहस, धैर्यशीलता, निर्णयक्षमता, उत्तरदायित्व, पराक्रम, सारासार विवेक बुद्धी हे गुणपण आहेत. आणि हे गुण केवळ स्वानंद मिळविण्यासाठी नाहीयेत. त्याचे सादरीकरण झाले तर सामाजिक दायित्व सुद्धा मी पेलू शकते.  आता मी या सादरीकरणासाठी सिद्ध होऊ पहात आहे. 
अर्रर..... पण या गुणांचा मालकी हक्क पुन्हा पूर्वापार पुरुषांकडे चालत आलेला. त्यामुळे या गुणांना साज पौरुषार्थाचा.... त्यामुळे हे गुण प्रकट करायचे की पुरुषांशी स्पर्धा हीच भूमिका आम्हाला समजेना.... आणि पुरुषांशी competition सूरू झाली. मग घरातील अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आर्थिक बाजू strong असणं गरजेचं आहे का ..ok ..मग मी आर्थिकदृष्ट्या सबल होणार... पण त्या बरोबरीने माझे वात्सल्यही कमी होता कामा नये....मग मी अस्तित्व आणि कुटुंब प्रेम हा झगडा माझ्याच पातळीवर निर्माण केला. डार्विन चा सिद्धांत मला खूप जवळचा वाटतो.... struggle for exsistence and Survival of fittest! स्त्री सुद्धा या सिद्धांताची शिकार झाली.... किंवा त्या नियमातून तिची सुटका नाही. स्त्रीत्व नाकारून पुरुषार्थ नको आहे तिला.... आणि केवळ स्त्रीत्व असेल तर तिचे  अस्तित्व नेहमी दुसऱ्या स्तरावरच गणले जाईल...किंवा गणना ही होणार नाही आणि ती गणना होण्याआधीच अस्तित्व संपुष्टात आणले जाईल हे दडपण आहे.
मग या सगळ्याचं combo pack मी Superwoman बनणार. स्त्रीत्व आणि पुरुषत्व माझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार. कधी सहज तर कधी जीवाचा आटापिटा करून... पुरुषार्थाचे वलय असलेले गुण माझ्यामध्ये आले तर आणि तरच माझा आत्मविश्वास प्रबळ ठरणार...नाहीतर माझे अस्तित्व पायदळी तुडवले जाणार... केवढी ही स्पर्धा.... 
आपण स्वरूप, व्याख्या यामध्ये अडकतो का? पुरुषांकडे सहनशक्ती, त्याग, सौंदर्य, वात्सल्य, कारुण्य नसते का? बापाचा जीव तीळतीळ तुटत नाही का? भावाचा हात नसेल तर बहीण पूर्ण होते का? पतीचे कर्तृत्व नसेल तर पत्नी सहज गृहलक्ष्मी होऊ शकते का? प्रियकराची उबदार मिठी नसेल तर स्त्री मधील प्रेयसी खुलू शकते का? स्त्रीत्वच्या प्रकटीकरण करण्यासाठी पुरुषार्थाच्या व्याख्येत अडकलेले हे गुण नाकारता येतील का?
स्त्रीत्व आणि पुरुषार्थ एकत्र आल्याशिवाय नवनिर्मिती होऊ शकत नाही. कोणाही एकाचे वर्चस्व किंवा प्राबल्य निसर्गाने बहाल केलेले नाहीये आणि ते त्याला मान्यही नाहीये. स्त्रीत्व आणि पुरुषार्थ समानता ही  मनुष्यत्व मध्ये विलीन केली जाऊ शकते का? HAPPY HUMAN DAY असू शकतो का? परस्परांना जाणणारा, ऐकणारा, सुनावणारा,  मानणारा, कदर करणारा, पूजन करणारा, असा सर्व गुणांनी परिपूर्ण असा पूरक गट निर्माण होऊ शकतो का? घरामधील, समाजामधील त्या व्यक्तीच्या भूमिकेला तिच्या स्त्री पुरुष असण्याच्या अपरोक्ष न्याय मिळू शकतो का? त्या व्यक्तीचा रोल profile लिंग निरपेक्ष असेल का? 
मनुष्यानुसार त्या गुणांचे प्राबल्य कमी अधिक असेल आणि ते असावे. तर आणि तरच पूरक गुणांची खाण असणाऱ्या व्यक्तीशी अद्वैत घडू शकते. 
हे अद्वैत घडता क्षणीच वर्चस्वाचे, सिद्ध करण्याचे, कपटाचे, छळाचे, अवहेलनेचे   सगळे खेळ संपुष्टात येतात.... आणि राहतो तो फक्त संवाद.... आत्म्याचा आत्म्याशी .... बुद्धिमान, सौंदर्यवान, भावनासंपन्न  मनुष्यत्वाचा ....
अशा संवादाची  वाट पहात आहे!