Tuesday, 17 October 2023

रंगात रंगूनी आमुच्या....

 आई राधा उदे उदे....
आई आज तुझा जोगवा मागत आहे.... 
आजीकडून जोगवा कशाकशाचा असतो हे ऐकत होते. आपल्याला समृध्द करणारा हा जोगवा असावा... आज मी ही समृध्दी मागत आहे.... कशाची ? तर ज्ञानाची... का? तर सामान्य स्त्री आहे मी. एक आई आहे मी.. भावी पिढीला घडवणारी शिक्षिका आहे आणि एका अशा पिढीतील आहे की जिने तिच्या आईवडिलांनी सांगितलेल्या रूढी परंपरांना असे का विचारण्याचे so called daring नाही केले आणि त्यातून जे तिला अनुभवातून मिळत गेले, समजत गेले त्यातून ती तरत गेली so called समृध्द होत गेली; आणि आता अशा पिढीला घडवण्याचे व्रत घेतले आहे की त्या पिढीला प्रत्येक हे असे का? याला समाधानकारक उत्तर दिल्याशिवाय तिला पुढे जाता येईना...
हा नऊ दिवसांचा तुझा जागर.... स्त्री शक्तीचे तू प्रतीक.... या काळात उपवास करून, अनवाणी राहून, केवळ पाण्यावर राहून, अनेक पीठांना भेटी देवून, सामूहिक भजने म्हणून, श्री सूक्त आवर्तनं करून, रास गरबा रचून अनेकविध मार्गांनी तुझी उपासना केली जाते. तुझे हे चैतन्य या सर्वांमध्ये यावे म्हणून तुझी आळवणी केली जाते.... विद्येच्या रूपाने, लक्ष्मीच्या रूपाने, धान्याच्या रूपाने, सामर्थ्याच्या रूपाने, शक्तीच्या रुपाने, भक्तीच्या रूपाने तुझा आमच्यात वास असावा... तुझी नऊ वेगवेगळी रूपे दर्शविली जातात. वेगवेगळ्या भावनांचे, शक्तीचे, प्रतीक असलेली रूपे... आमचा नमस्कार एकाच चरणी जाणार हे बुद्धीला माहीत असले तरी तुझ्या दिव्यत्वाची प्रचिती देणारी ही रूपे मनाला साद घालत राहतात अग... 
कारण आमच्या जगण्याशी ही रूपे कधी ना कधी एकरूप होतात... आणि या स्त्री सामर्थ्याचा अभिमान उचंबळून येतो ग... तुझी पूजा अर्चा करताना, तुझ्या समोरच्या निरंजनातील तेवत असलेली वात बघत असताना हे चैतन्य आमच्यातही संक्रमित होवो अशी इच्छा प्रकट होते. निरांजन नऊ दिवसच आम्ही देवासमोर तेवत ठेवतो... पण त्यामध्ये मिळणारी चैतन्याची प्रेरणा अखंडकाळ टिकून रहावी म्हणून याचना करतो ग...
मग या उत्सवात विविध क्षेत्रातील अनेक सम्राज्ञी स्त्रियांचे पूजन, सत्कार करून तिच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करून भावी पिढीसाठी नवे आदर्श घातले जातात. बाईपण भारी देवा.... उंच माझा झोका या मथळ्याखाली होणारे तिचे सत्कार तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. तिचे प्रेम, वात्सल्य, करारीपणा, संवेदनशीलता, कर्तबगारी, याचे ठसे समाजात उमटायला सुरुवात होते. आणि तिचा उत्सव नऊ दिवसांचा न राहता अखंड काळाकडे वाटचाल करायला सुरुवात होते. 
ज्यांनी स्वतः ला वेगवेगळ्या क्षेत्रात सिद्ध केले आहे त्यांचा सत्कार होतो अग... तिला काम करण्याची अजून उर्मी येते. पण प्रश्न उरतो तो सामान्य स्त्रीचा... स्वतः ला सिध्द करता येऊ शकते किंबहुना स्वतः चे अस्तित्व स्वतः च्याच डोळ्यात अभिमानाने बघण्याची ताकद येण्यासाठी जिला काही अवधी लागतो... त्या स्त्रीचा... ती काही रूढी परंपरांच्या विचारात असते, कदाचित काही पाश तिनेच निर्माण केलेले असतात, त्यानेच ती त्रस्त असते. आणि घर आवरता आवरता स्वतः च्या बुद्धीची आणि मनाची खोली आवरायची असते हेच ती विसरून जाते किंवा थोडी मागे पडते. 
ती इतकी सुंदर आहे ना...कधी कधी त्याचा विसरच तिला पडतो. हे सौंदर्य केवळ रूपाचे नसते याचीही तिला जाणीव करून द्यावी लागते. म्हणून तुझी ही नऊ रूपे. या नऊ दिवसांचा जागर करत असताना तिला तुझ्याशी connect होण्याची संधी कोणाच्या तरी भन्नाट कल्पनेतून निघालेली दिसली. एक वर्ष सगळे रस्ते, मंदिरे, कामाच्या जागा एकाच रंगाने दिसायला लागल्या. कोणीही एकत्र येऊन मास्टर प्लॅन न करता... WHATSPP... तंत्रज्ञान... तिथे स्त्रीचे कपड्यांचे, रंगांचे प्रेम लक्षात आले. देवीला ज्या रंगांचे वस्त्र तिची पूजा झाल्यावर नेसवले जाते त्याच रंगांचे वस्त्र या दिवसात लेवून आजूबाजूला वावरणाऱ्या नारी शक्तीचे अस्तित्व लक्षात येवू लागले. मंदिरात जिची आराधना करतो ती घरातही आहे... कामाच्या ठिकाणीही आहे आणि त्याच चैतन्याने कार्यरत आहे. आपल्याकडे रंगांचे वेगवेगळे महत्त्व सांगितले जाते. पांढरा शांत, लाल प्रेम, केशरी तेजस्वी, निळा स्थिरता, पिवळा आनंद, जांभळा नवनिर्मिती, हिरवा समृध्दी... ज्ञानाच्या विस्फोटाच्या दुनियेत अनेक ठिकाणाहून ही माहिती येत जाते... त्याच्या खरे खोटेपणा मध्ये सामान्य स्त्री नाही अग अडकत... तिला ते करून आनंद वाटतो ना, सहजता येते ना, आपणही इथे आहोत हे स्वतः ला सांगता येते ना एवढे तिच्यासाठी पुरेसे असते... लाल रंगाची साडी दुकानात घ्यायला गेली तर  त्या रंगाची पाहिजे ती छटा मिळेपर्यंत दुकानदाराला जेरीस आणणारी ती नवरात्राच्या त्या एका दिवशी लाल रंगांची वेगवेगळी रूपे बघून हरखून जाते.. काही जणासाठी हे fashion असेल, काही जणांसाठी सेल्फी स्टेटस असेल तर काही जणांसाठी ते रिकाम्या वेळेचे उद्योग असतील. पण कंपन्यांमध्ये, संस्थेमध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या स्त्रिया एकमेकींना दाद देखील देवू लागल्या... घरातच राहणारी स्त्री काही निमित्ताने का होईना बाहेर पडली... समोरची स्त्री ही सुद्धा आपल्याच सारखी की याची पुसटशी का होईना जाणीव येऊ लागली. तिच्या भावनांचे तरंग ही माझ्याच सारखे की... याची जाणीव होण्यासाठी ही छोटी सामूहिक कृती काम करू लागली... देऊळ नावाचा एक सुंदर चित्रपट होता. एका देवळाभोवती किती व्यक्ती connect होतात असा काहीसा अर्थ प्रतीत करणारा एक चित्रपट... जीवो जीवस्य जीवनम! 
त्यामुळे एका रंगाचे कपडे परिधान करून हा उत्सव करणे हा नियम नक्की होवू नये आणि हे करूच नये असेही होवू नये ना...   तर हे मी का करत आहे? याचा विचार करायचा असतो या साठी या सामान्य स्त्रीला घडवणे आवश्यक आहे. नाहीतर ती फक्त तंत्रज्ञानाच्या प्रवाहात वाहणारी, स्वत:चेही मत असते हे विसरणारी असेल. पुढील पिढीला या सामूहिक कृतीतून काय साध्य झाले हे सांगताही येण्यासाठी या स्त्रीला डोळस करणे आवश्यक आहे. 
 तिला आठवण करून द्यावी लागते... अग जिची तू एवढ्या भक्ती भावाने उपासना करत आहेस तिचा अंश तुझ्यात आहे. पुढच्या पिढीला जे संस्कार देत आहेस त्या संस्कारात नरनारीचा यथोचित आदर करायचा असतो हा संस्कार आवर्जून दे आणि त्यासाठी तुला जे कर्म करावे लागेल ते पूर्ण विचारपूर्वक कर.... तुझ्या या कर्मांना कोणी कांड म्हणता कामा नये एवढी ताकद तुझ्या सदसद्विवेकबुद्धीमध्ये आण. कारण तू निर्माती आहेस...
 आई...'म्हणजे मी नेमके काय करू?' हा प्रश्न पडणाऱ्या अनेक सामान्य स्त्रिया या समाजात आहेत. त्यांना एकत्र कसे आणायचे? तुझा खरा जागर त्या एकमुखाने स्त्री शक्ती वाढविण्यासाठी कशा करतील? काही
बायका बायकांचे आपापसात पटत नाही. तो एक स्त्री जातीला लाभलेला शाप आहे... त्याचे काय करायचे? आता त्याची तीव्रता एवढी नसेल पण स्त्री धर्मातच धुसफूस चालूच असलेली दिसते की... कोणतीही सामूहिक  कृती करायची म्हटली की यांच्या शंभर दिशांना कल्पना... कोठे आणि कसे एकमत आणायचे? तिच्यामध्ये भावनांचे अनेक रंग आहेत पण ते त्या एकरूप होवून कधी भिजणार? स्त्रीत्वाची संवेदनशील वृत्ती आणि पुरुषार्थचा कणखर बाणा याचे आदर्श उदाहरण ती स्वतः मधून कधी घालून देणार? तिचे अस्तित्व दाखवणारी ३३% आरक्षण तिला आज लाभले पण ती त्याची सवय करून घेणार की आता त्याची गरज नाही असे ठणकावून सांगणारी स्वयंसिद्धा होणार? स्वतः ची दोरी इतरांच्या हातात देणारी अबला ठरणार की घरातील कर्त्यासोबत कर्तीदेखील होणार? 
 गंगूबाई काठीयावाड चित्रपटात पांढऱ्या रंगाचे लोभस वर्णन आहे. नीरक्षीर विवेक जाणणाऱ्या हंसाचा रंग ही पांढरा आणि पाण्याने न भरलेल्या ढगांचा रंग ही पांढरा आणि पाण्यापासून तयार झालेल्या बर्फाचा रंग ही पांढरा... रंगामागचे विज्ञान सांगते जो रंग आपल्याला दिसतो तो त्याचा नसतोच... इतर रंगांना धारण करून जो रंग तो घेत नाही तो आपल्याला दिसतो... स्त्रीने कोणत्या भावनेचा, स्वभावाचा रंग आपला नाही हे नक्की ठरवावे आणि या उत्सवात त्याचा त्याग करता येईल का असेही जरा स्वचिंतन करावे... हे चिंतन करण्याच्या बुद्धीचा जोगवा तिच्या पदरात घाल आई... 
समाजाने ठरवून दिलेल्या रंगांच्या परिघात स्वतःच्या छटेचा परीघ रेखून त्यात सर्वांना सामावून घेण्याचे ममत्व धारण करण्याचा स्थायी भाव तिच्यामध्ये दे आई... माऊली जगाचा उद्धार करत असते... अस्वस्थतेचा रंग धारण करणाऱ्या या जगाचा उद्धार करण्याची ताकद तिला दे..... आईला अहं नसतो म्हणून ती श्रेष्ठ.... म्हणून ती उद्धारू शकते.... ही स्त्री तुझे रूप आहे आई... तिला विचारांनी समृध्द कर आई... तिचा रंग तिला ठरवू दे आई.... तिला ठरवू दे....
उदे ग अंबे उदे.....
स्मिता माने
9422034863
 


 

Saturday, 7 August 2021

संक्रमणाचे आठ दिवस.....

         खूप दिवसांनी लिहायला बसले आणि ही बैठक जमून आली याबद्दलच समाधानी आहे. संक्रमणाचा हा कालावधी होता हे प्रकर्षाने लक्षात आले. म्हणून लेखाचे नाव तद्नुषंगाने ठेवले.

        भाऊ(स्व. वा. ना. अभ्यंकर) सांगायचे की कोणत्याही गोष्टीची सवय होण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी लागतो. बाबांचे प्रत्यक्ष नसणे यासाठी हा कालावधी झालेला आहे. त्यांच्या अप्रत्यक्ष असण्याची सवय करून घेण्यासाठी मला हा कालावधी महत्त्वाचा वाटतो. त्यांचे अप्रत्यक्ष अस्तित्व स्वीकारून मार्गक्रमण सुरु ठेवायचे आहे. ही जागरुकता, शहाणपण निसर्गाच्या सानिध्यात आपली आपल्यालाच समजत जाते आणि हळूहळू दृढ होत जाते. 

        या आठ दिवसात हाच निसर्ग मला उपदेश करता झाला तो लेह लडाखच्या डोंगरवाटेमध्ये. मागच्या वर्षी वीणा वर्ल्ड तर्फे book केलेली, lockdown मुळे रखडलेली  सिक्कीमची ट्रीप  यावर्षी लेह लडाखच्या वाटेवर घेऊन आली. बघायला गेलो तर शुष्क कोरडा प्रदेश..... भूगोलाच्या पुस्तकात वर्णन केलेली जमिनीची अपरूपे चार ते पाच वाक्यात असणारी इथे वैविध्याचे आविष्कार घेऊन आपल्यासमोर उभे आहेत. खरेच त्यांच्या मनात काय सुरु आहे याचा अंदाज घेता येत नाही. कधी रेतींची बनलेली, कधी छोट्या गारगोटी दगडांची बनलेली तर कधी मोठे मोठे पथ्थर एकावर एक रचलेले, कधी विस्तृत घसरण, कधी वेगवेगळ्या अनंत वळ्या, तर कधी मातीवर दगडांचे सुंदर नक्षीकाम. centre of gravity चा अचूक अंदाज, मोजमाप घेता येईल का? त्यांची एकमेकांवर असलेली रचना बघून एकाने जरी आपली जागा सोडली तर.... Avalanche.... सतत भीतीचे छत्र पण तेवढेच लोभस आणि आकृष्ट करणारे. फोटो तरी किती काढायचे आणि कशाकशाचे काढायचे? 

    नेमकी सुरुवात , मध्य, शेवट कसा वर्णन करू? काराकोरम डोंगरांच्या या रुद्र अवताराला थंडावा देणारा तो बर्फ..... पांढराशुभ्र, सफेद मुकुटमणी...... त्याच्याच वितळण्याने खळखळाट करत वाहत जाणाऱ्या थंडगार सौंदर्यवती  नद्या..... जिच्यामुळे आपण उदयास आलो ती सिंधू नदी नतमस्तक झाल्याशिवाय रहावत नाही. River of death म्हणून परिचित असलेली श्योक नदी, आकाशाचा निळाशार रंग स्वतःमध्ये सामावून घेणारी हुंडेर नदी कितीही काळ त्यांच्या काठाशी बसायला मिळावे अशी इच्छा उत्पन्न झाल्याशिवाय रहावत नाही. नदीकाठी पण नदीच्या पाण्यात पाय सोडण्याचे धैर्य नक्कीच होत नाही. या नद्यांनी स्वतःचे पावित्र्य जपलेले आहे. 

    इथे तुम्हाला जमिनीची अपरूपे जशी बघायला मिळतात तसेच पाण्याला अनेक रंगछटा असतात याचेही दर्शन होते. Pangonk lake - १३५ किमी पसरलेला..... त्याला हिरवा म्हणावा, मोरपंखी म्हणावा कि निळा म्हणावा? की सगळ्यांना सामावून घेणारा? त्याच्या ठायी बसून काय हितगुज करणार तुम्ही? तुम्हीच इतके शांत होऊन जाता की स्वसंवादही करणे जड होऊन जाते. दिवसा, सायंकाळी सूर्यकिरणांचे त्यावर अधून मधून पडणारे तेज, पावसाच्या सरी, ढगाळ वातावरण, हवेतील गारवा, आणि रात्री वेड लावणारे ताऱ्यांचे आच्छादन..... हे सगळं डोळ्यात साठवण्याची, स्मरणात ठेवण्याची तुमच्याकडे किती क्षमता आहे? हाच मनाला पडलेला प्रश्न...... त्याकाठी ध्यानस्थ होऊन या अपारशक्तीला तुम्ही केवळ वंदन करू शकता. 

    प्रवास.... इथला प्रत्येक प्रवास खडतरच असतो, कारण त्याचे फलित शेवटी एका मनोरम, आनंददायी स्थळी पोहचवत असते. आत्ता तुम्हाला असे वाटते कि तुम्ही खाली गावातून जात आहात आणि पुढच्या पाच  ते सात  मिनिटात बाजूला बघितले कि लक्षात येते कि तुम्ही समोरच्या डोंगराच्या छातीशी आहात. आणि पुढे जाणाऱ्या गाड्या अजूनही वर आहेत. त्या रस्त्यावरून दोन गाड्या पास होऊ शकतात का असा प्रश्न डोकावीत असतानाच समोरून मिलिटरी चे मोठे trucks येताना दिसतात आणि जागा काढणे म्हणजे नेमके काय याची प्रचिती तुम्हाला याची देही याची डोळा अनुभवायला मिळते. वर बघितले तर हिमालयाच्या सफेद  रांगा, खाली बघितले तर नद्यांचे सतत वाहणारे प्रवाह आणि समोर बघितले तर डोंगरातून निघणारे वळणावळणाचे मार्ग.... प्रत्येक वळण वेगळे! सर्व निसर्ग तुमच्या दिमतीला. तपकिरी रंगही तुम्हाला आवडू लागतो. मग निसर्गाच्या नेहमी आवडणाऱ्या हिरव्या रंगाचे अस्तित्व इथे तसे कमीच. पण जिथे जिथे आढळला तिथे त्याचे स्वतःचे अस्तित्व त्याने खुलवून ठेवले होते. छोटी रंगीबेरंगी फुले घेऊन विरळ स्वरुपात तो होता..... अशाही वातावरणात तग धरून होता.

    आपण ज्या परिसरात असतो त्या परिसराच्या vibes तुम्हाला साद घालत असतात. इथे जिथे तिथे केवळ साहस, धैर्य, सकारात्मकता याच vibes चे दर्शन झाले. साहस करण्यासाठी तुम्हाला दगडासारखे टणक, रुद्र रूप धारण करावे लागते पण त्याच वेळी बुद्धी स्थिर ठेवावी लागते. दगडांच्या माथ्यावर असलेला हा बर्फ, हवेतील गारवा  ही अपेक्षित शांतता मिळण्यासाठी पूरक ठरत असतील कदाचित. म्हणूनच तुमच्या क्षमता आजमावण्यासाठी ही सुयोग्य जागा आहे. तुमच्या बाजूने अनेक bikers धाडधाड आवाज करत एकामागून एक जाताना दिसतात..... passion.... चांगला पास, खार्दुंगा पास पूर्ण  केल्यानंतर त्यांना driving ची अनुभूती नक्कीच लाभली असेल. Oxygen level कमी असताना स्वतःला ताणायचे....नव्हे आजमवायचे.... मग bike च कशाला? सायकलवर जाऊ असेही म्हणणारे बहाद्दूर आम्हला इथे भेटले. 

    इथले रस्ते साद घालतात, डोंगररांगा साद घालतात.... ज्याला प्रतिसाद द्यावासा वाटला त्यांनी स्वतःला आजमावले आणि कदाचित त्यांना आयुष्याचा सूर, ध्येय गवसले असेल. इथे वयाचे बंधन नाही हे विशेष.

    जशी निसर्गाची रूपे आढळली तशीच माणसांचीही रूपे आढळली. खूप अनोळखी असणारी माणसे कमी कालावधीत कशी सहजपणे connect होतात हेच समजत नाही. सहज होणाऱ्या गप्पामधून काही सूत्रे गवसतात. माणसे आयुष्याकडे कशी बघतात हे समजून घेताना आपण तुलना करू लागतो. त्या त्या परिस्थितीला प्रत्येकाने दिलेले वेगळे उत्तर असते. असाही विचार करता येऊ शकतो की हा आपल्याला गवसलेला दृष्टीकोन असतो.  आयुष्यात खूप काही बघितल्यानंतर परिस्थितीला सामोरे जाण्याची शांतता तुम्हाला हवीहवीशी वाटू लागते. पाय जमिनीवर, नेमके काय करायचे आहे आणि का करायचे हे ठाऊक असणारी माणसे जेव्हा तुमच्या आजूबाजूला येतात तेव्हा त्यांचा कमी कालावधीचा सहवास हा कायम स्मरणात राहतो. 

    या कालावधीत दोन पुस्तकांचे वाचन करू शकले याचे सर्वात मोठ्ठे समाधान. वाचायचे होते. सतत वाटत होते एका बैठकीत वाचन घडावे पण होतच नव्हते. पण तुमच्या याही बाबी कदाचित लिखित असतात. पुस्तके पण सहज निवडली होती पण ती पूरक ठरली. रामचंद्र जोशी अनुवादित  साद देती हिमशिखरे आणि  वि. वि. पेंडसे लिखित भगिनी निवेदिता. सर्वसंगपरित्याग, ध्येय दर्शन, गुरूंचे मार्गदर्शन, इप्सित गाठता येणे, हिंदू धर्म, अध्यात्मशास्त्र यांचा मिलाफ असलेली ही पुस्तके. प्रेरक आणि विचार करायला लावणारी. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या पण प्रत्येकाला त्याची आस. ते मिळवण्याचे मार्ग निराळे, ते नेमके मिळाले आहे कि नाही  कितपत मिळाले? आता पुढे काय हेही सांगता येईल कि नाही हे माहित नाही. पण प्रत्येकाचा प्रवास त्याचसाठी.... भीषणाची पूजा करता आली पाहिजे हा विवेकानंदाचा संदेश. मनातील भावनांना बंध घालता आले पाहिजेत कदाचित तेव्हाच ध्येय साध्य करता येईल. 

        इथे बघितलेली स्थळे, भेटलेली माणसे, घडलेला प्रवास, तंबूत थंडीत घालवलेल्या रात्री, मिळालेले संदेश हे सारेच प्रेरक आणि मरगळ दूर करणारे आहे. इथला निसर्ग रौद्र रूप धारण करतो तेव्हा तो भीषण नक्की वाटत असेल. पण इथले सैनिक याची पूजा करताना दिसतात. त्यांच्या कॅम्प ठिकाणी एक वाक्य वाचले त्याचा आशय असा होता कि, आयुष्यात कधीतरी तुम्हाला करावेसे वाटणारे साहस हे आमच्यासाठी रुटीन आहे. खूप काही लिहिण्यासारखे आहे पण आत्ता या नोटवर नक्की थांबावे असे वाटले.





Sunday, 10 January 2021

अनुभव पचवणे.....

     आता हे काय मध्येच? असे नक्की वाटेल.  पण विचारांचा भुंगा. कसा कोठून डोक्यात शिरतो, दोन चार दिवस जरा मुक्काम करतो, पाहुणचार आपल्या आवाक्यातील आहे, किंवा विषय जिव्हाळ्याचा असला की तिथेच रेंगाळतो. त्यालाही बाहेर पडायचे असते. जाता जाता काहीतरी आठवण ..म्हणून हे लेखन.

    असो. प्रस्तावना भरपूर झाली. तर निमित्त होते, उपासनेनंतर करण्यात येणारे वाचन. आदरणीय संचालकांच्या 'जिज्ञासापूर्ती' या पुस्तकातील अनुभव पचवणे म्हणजे काय? हा लेख. आगंतुकपणेच माझ्या वाट्याला आला. पण माझी साथ काही सोडेना. मग  त्याच्या साथीने जे  काही गोळा झाले ते  जरा नीट मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

    लेखाची सुरुवात ... एखादा विलक्षण अनुभव आपण घेतो. कधी आनंदाचा, कधी आश्चर्याने थक्क होण्याचा, कधी भीतीचा, कधी गोंधळून जाण्याचा, कधी चीड आणणारा, कधी हसायला लावणारा, कधी मंत्रमुग्ध होण्याचा, कधी उत्साहाने ओसंडून जाण्याचा. त्या अनुभवाची आठवण आल्यावर मनामध्ये पुन्हा फक्त आधीची भावना निर्माण झाली तर आपण  तो अनुभव पचवलेला नाही.

    आणि ही tagline मला माझ्या अनुभवांकडे बघायला घेऊन गेली. कोणते अनुभव असे आहेत की जे मी अजून पचवलेले नाहीयेत? कोणते अनुभव मला पचवावे वाटत नाहीयेत? आणि कोणत्या अनुभवांची मी चवही चाखली नाहीये? कोणते अनुभव मी आवर्जूनघ्यावेत आणि पचवावेत सुद्धा? असे अनेक प्रश्न...

    वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक कर्तव्ये करताना, एकट्याने घेतलेले, सोबतीने घेतलेले, नाती जपताना, नाती निर्माण होताना , कार्यामध्ये सक्रिय असताना, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्वतःचे हट्ट जिरविण्यासाठी जाणीवपूर्वक, परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी हतबल होऊन किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करत, स्वतः ला सिद्ध करण्यासाठी...... केवढी ही अनुभवामागची कारण मीमांसा.

    सर्वच जण अनुभव समृद्ध आहोत की! कैक उन्हाळे पावसाळे बघून झालेले, कैक उन्हाळे पावसाळे बघत स्वतःला अजूनही चाचपडत असणारे आणि उन्हाळे पावसाळे पण असे काही असतात का हा प्रश्न पडलेले सर्वच जण......या अनुभव समृद्धतेचे धनी ठरतात.

    मग आता हे अनुभवांची संख्या जास्त matter करणार आहे की....यातले अनुभव पचवणारे किती आहेत? ही संख्या जास्त matter करणार आहे? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारावा असे वाटते. हा अनुभव माझ्यासाठी काय घेऊन आलेला आहे आणि याकडे मी कसे बघायचे आहे याचे  चिंतन प्रकर्षाने नक्की घडावे. 

    good.... हा विचार  नक्की होऊ शकतो की.. अरे त्या अनुभवातून आम्ही सावरलेलो आहोत किंवा आता तो आनंद त्या प्रमाणात व्यक्त होत नाही, त्याची तीव्रता नक्की कमी झालेली आहे. पण पुन्हा तसाच अनुभव आला तर तसेच मला आकाश ठेंगणे होणार आहे का ? किंवा माझ्या पायाखालची जमीन तशीच  हलणार आहे का? अशा प्रश्नाची उत्तरे हो असतील तर अजूनही आपण तो अनुभव पचवलेला नाही.  

    हे अनुभव पचवत पचवतच सिद्धी मिळते का? अनेक गोष्टी समोर आल्या... माझ्या डोक्यावरून आई वडिलांनी हात फिरवला, लेकाने येऊन कडकडून मिठी मारली, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या मिठीत विसावणे, आपल्या कर्तृत्वाकडे विश्वासक नजरा खिळून असणे, यशानंतर मिळणारी कौतुकाची थाप, दिलखुलास गप्पांच्या प्रसंगी खळखळून हसणे हेही आपल्याला येणारे अनुभवच आहेत की.... हेही पचवायचे का? हे पचवायला गेलो तर आयुष्यात निरसता येणार नाही का? हे अनुभव आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. कार्यप्रवण बनवतात. मग हे कसे पचवायचे? अन्न पचवताना जसे पौष्टिक घटक अंगी लागतात आणि बाळसे धरते ना अगदी तसे.... हे अनुभव पचवताना असेच हितकारक घ्यायचे, पण ते मिळाले तरच कार्यप्रवण राहू असा हट्ट धरायचा नाही बहुतेक... हा मी काढलेला अर्थ.

    आयुष्य काही सकारात्मक ऊर्जा घेऊनच येत नाही.  अनेक नकारात्मकता निर्माण करणारा ही एक गट भेटीस येत असतो. ज्यांचे वलय तुमचे अस्तित्व, कर्तृत्व नाकारत असत, सततचे खच्चीकरण, अपयश, अपेक्षाभंग, परिस्थितीचा घाला याही गोष्टी अनेकदा भेटत असतातच की.. अंगाची लाही लाही करणारे, हृदय पिळवटून टाकणारे, डोक्यात अक्षरश: थैमान घालणारे अनुभव कोणालाही चुकले नाहीयेत. सकारात्मक उर्जेत बाळसे धरायचे असते तर नकारात्मक उर्जेत ताकद पणाला लावायची असते बहुतेक.... स्वतःला किती पेलू शकू? हे आजमवायचे असते बहुतेक... काही अनुभव, प्रसंग इतके कारुण्यमय असतात कि दुष्मनावर पण वेळ येऊ नये असे वाटते. नाहीतर रोज मरे त्याला कोण रडे? असे म्हणत केवळ दिवस रेटणे ही वृत्ती व्हायची. हे जर रेटारेटीचे  आयुष्य नको असेल तर आधीचे अशा प्रकारचे अनुभव तावून सुलाखून बाहेर काढणारे ठरले... हेही असेच असतील हा एक विचार आधीचे अनुभव पचवताना आत्मसात करायचा असतो बहुतेक... 

    अनुभव घेतला की पचला हे गृहीतक चुकीचे. त्याला पचनासाठी आवश्यक असणारा वेळ पूर्णपणे नक्की दिला गेला पाहिजे. ती एक प्रक्रिया असते ज्यामध्ये तुम्ही घडत असतात.  तो वेळ न देणे म्हणजे अपेक्षित परिणामांमध्ये interfere करण्यासारखे होईल असे वाटते.

    Assimilation... सात्मिकरण.... विज्ञान विषयातील Digestion ची process तत्वज्ञानरुपी फारच प्रभावी ठरत चालली आहे असे वाटले. काही अन्न पदार्थ means अनुभव हे चव घेण्यासाठी देखील तुमच्या समोर येणार नाहीत. पण समोरच्या व्यक्तीच्या ताटात असू शकतात. त्या व्यक्तीशी संवाद साधला तर ही चव चाखावी का? चाखावी लागली तर तुम्ही त्या क्षमतेचे आहात का? किती ताकदी पर्यंत आपल्याला कस लावावा लागेल याची चाचपणी करता यायला हवी....

    असो.... पण हे सगळे का करायचे? चालले आहे की ठीक... special लक्ष न देताही अनुभव पचत आहेत. अन्न पचताना कोठे लक्ष द्यावे लागते? करतात च सगळ्या यंत्रणा त्यांचे त्यांचे नीट काम.... हाही मलाच पडलेला प्रश्न....

उत्तरही शोधावे म्हटले... शरीर क्रिया मेंदूच्या नियंत्रण कक्षेत येतात. म्हणून ते आपल्याला त्रासाचे होत नाही.... अनुभवांचे पचन मनासाठी परिणामकारक ठरत असते. त्याला अस्थिरतेचा शाप.... त्याची अस्थिरता शाप बनून द्यायची नसेल तर मेंदूला इथेही लक्ष घालावेच लागणार. कोणी याला practical वृत्ती  म्हणेल, कोणी याला सिद्धी म्हणेल किंवा कोणी योगी म्हणेल, किंवा कोणी कशाचीच कदर नसलेला असेही म्हणू शकेल. 

       पण अनुभव पचवलेलेच कार्य सिद्धीस नेऊ शकतात. उत्तमता गाठू शकतात. आणि remarkable काम करण्यासाठी पाय रोवून उभे राहू शकतात. 

    लेखाचा शेवट : अनुभव पचवल्यानंतर स्थळ, काळ, प्रसंग आणि त्यातील व्यक्ती बदलल्या तरी आधीच्या अनुभवाचा उपयोग नवीन परिस्थितीला शहाणपणाने सामोरे जाण्यासाठी होतो.   

Friday, 20 November 2020

माझे मौनाचे प्रयोग

    केवळ नाम साधर्म्य आहे असे समजावे ... आत्ताशी पाण्यात पडले. सिद्धता अजुन यावयाची आहे. पण स्पर्शच सुखावह होता की सांगितल्याशिवाय राहवेना. म्हणून हा लेख...किंवा अनुभव कथन...
मौनाचे तास, मौन संवाद, असे अनेक शब्द परिचयाचे असतात. काहीही प्रतिसाद त्यावेळी बोलून द्यायचा नाही. Be viewer of the incidence... And just observe yourself also.
Art of living चा advance course केला होता. त्यादरम्यान तीन दिवस मौन ठेवले होते. पण त्यांचे sessions सुरू असायचे. त्यामुळे आपण मौन केले आहे याचा कौटुंबिक, सामाजिक अनुभव घेता आला नाही. तेव्हाचा अनुभव  वेगळ्या विश्वाचे दर्शन करणारा होता.
         याच विश्वात राहून असा काही मौन पाळता येईल का? असा विचार डोकावला. आणि स्वतः वर असे प्रयोग करून बघता यायला हवेत याच एका उद्देशाने माझा protocol मीच तयार केला. Protocol आपला असला तरी स्वतःही त्याच्याशी cheating करायची नाही हा एक clause त्यामध्ये add केला.
            दिवाळीच्या सुट्टी सुरू.. त्यामुळे म्हणावा तसा निवांतपणा होताच.. व्यक्ती संवाद हा कामापुरता असल्याने आणि कामे माहीत असल्याने माझ्या मौनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही याची खात्री होती. कौटुंबिक पातळीवर हे ठरले. आणि मौन कामाच्या वेळेत करायचे आणि अनुभव गाठीशी घ्यायचे  असाही विचार होता. पण हाच नियम WhatsApp, social media साठी पण पाळला. तेवढ्या कालावधीत फोन करायचे नाहीत. WhatsApp ला हात लावायचा नाही असेही ठरवले. आणि खरेच कोणाचीही काहीच अडचण झाली नाही.
सोमवार मंगळवार तीन तास मौन... 'माझे मौन आहे' हे कोणाला जाणवले ही नाही.... वावा.. मलाच बरे वाटले. नंतर जरा तास वाढवले.  पाच तास, सात तास...
        Sign language सुरू झाली. समोरच्या व्यक्तीच्या हेच लक्षात येत नाही की मी फक्त बोलत नाही. ऐकू शकते. ते सुद्धा आपल्याशी हातवारे करून बोलायला लागतात. मज्जा आली. आपली न बोललेली भाषा कोण समजू शकते, न बोलताही आपल्याला पोहचता येऊ शकते का... असे काही प्रश्न मनात डोकावले.
       लहान मुलांचा acceptance खरेच खूप बढिया असतो हे या निमित्ताने अनुभवले. अभिषेक अक्षरशः enjoy करायचा. माझे तेच शब्द तीच वाक्ये त्याच टोन मध्ये बोलायचा. त्याच्याकडून काही चुका झाल्यावर तर म्हणाला बरे झाले मौन आहे नाहीतर आख्खे भाषण ऐकवलं असतं आत्ता... आणि मग आपण अंतर्मुख होतो. या दरम्यान तर त्याला दवाखान्यात पण घेऊन जावे लागले. असे वाटले की कदाचित आता मौन सोडावे लागणार. पण आईचे मौन पूर्ण करायचे असे बहुधा त्यानेच ठरवले होते. डॉक्टरांशी बोलणे, मला काय सांगायचे आहे असा सगळा संवाद त्याने मस्त पार पडला. आणि मग मी एक शिकले आपण मुलांना व्यक्त होण्याची संधीच देत नाही. एक व्यक्ती म्हणून संधीचे सोने त्यांनाही करायचे असते आणि ते ते करतात. माझी sign language decode  करताना देखील तो बरेच प्रांत फिरला.थोड्या प्रमाणात का होईना explore केले त्याने. अजुन एक समाधान माझ्या पदराशी पडले. अडत नाही काही. अलिप्तता घेतली की सौंदर्य अजुन खुलून दिसते.
          मग आता  पुढे? अजुन काय stretch करायचे की काय करायचे... चला आता एक दिवस पूर्ण मौन... आवडीचा वार शुक्रवार... जन्मदिवस ना...जरा नाळ जोडलेली आहे. Basic instructions आदल्या रात्रीच देत होते.. पण 'माहिती आहे'..आता काही सांगू नको असा अभिषेकनेच विश्वास भरला..
         आलेले फोन कॉल स्वीकारायचे पण बोलायचे नाही. समजून घेतात लोक. आणि आपल्याला oppose होणार नाही आज या जाणिवेने तर संधी म्हणूनही कॉल करतात. आपण काय काय react झालो असतो आत्ता असे वाटून गेले. आणि मनातल्या मनात मस्त हसू उमटते. आपणच आपल्याला judge करू लागतो. आणि इतरांच्या नजरेतून आपण कसे आहोत याचा प्रामाणिक अंदाज आपल्याला नक्की येतो. 
         Jokes apart... काय निष्पन्न झाले? Determination.. ठरवलेले पूर्ण करता येते का? हे समजले. त्यासाठी साथ कशी मिळते हेही लक्षात येते. कार्य पूर्ततेसाठी नवीन वाटांचा शोध झाला. स्वतःचा आणि इतरांचाही.... Wavelength जुळते.
       आणि सर्वात महत्वाचे organised व्हायला वेळ मिळतो. अनेकदा ऐकतो स्वतःला वेळ द्या. पण म्हणजे नेमके काय करा हे स्वतःलाही नेमके माहीत नसते. तो नेमकेपणा आणायला म्हणजेच organised व्हायला आपणच आपल्याला  यानिमित्ताने संधी देतो. 
        प्रत्येकाचीच दोन मने असतात. त्या दोघांनाही वाटत असते आपले ऐकून घ्यावे. त्या दोघांचेही ऐकायला वेळ मिळतो. आणि मग लक्षात येते काही निर्णय किंवा वागणे आपण दोन्ही मनांचे पूर्ण ऐकून न घेताच घेतलेले असतात. कारण आपल्या समोर तिसरी व्यक्ती असते आणि पूर्वग्रह नुसार आपल्याला त्या व्यक्तीला follow करायचे असते किंवा विरोधात जायचे असते.
       अशा प्रकारचे आपले वागणे असू शकते असा माझा एक विचार झाला. मौनाचे अजून प्रयोग करताना may be यावर पण भरपूर आंदोलने होतील. पण ती मी शांतपणे enjoy करू शकेल बहुतेक..
गाठीशी अजून काही भावपूर्ण अनुभव आले. मुलगी उद्या दिवसभर बोलणार नाही म्हणून बाबांचा आदल्या रात्री आलेला कॉल, आपले बोलणे ऐकायला आसुसलेले सासू सासरे, अभिषेक शी tuning, WhatsApp वर इतरांचे status न पाहिल्याने विचारांमध्ये येणारी स्थिरता, आणि ठरवलेले करू शकतो हा आत्मविश्वास. .. म्हणजे इतके की आत्ता कोणी बोल म्हटले तरी तोंडातून शब्द फुटेना... हे बघून माझे मलाच विचित्र वाटत होते जरा...
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या लेखनाच्या प्रसवकळा....lockdown च्या काळात अनेक नवीन गोष्टी शिकले आहे. अनेक नवीन अनुभव गाठीशी होते... लिहावे असे वाटत होते पण .... असो... ते organised च होत नव्हते. या स्वतः वरील प्रयोगाने स्थिरता नक्की लाभली ..
           असेही युक्तिवाद होऊ शकतात..की मग आता बोलूच नका.. रहा शांत... पुन्हा विज्ञान... ज्या क्षमता दिल्या आहेत त्यांचा वापर झाला नाही तर त्यांची गत माणसाच्या शेपटासारखी होते.. .. विश्रांती आणि कायमची झोप यात काहीतरी फरक आहे ना...
मौन.. म्हणजे पुणेकरांची... १ ते ४ ची special tip... Enjoy this form of वामकुक्षी..

Sunday, 19 April 2020

वर्तमान जगताना....

.
            Hi.... सगळं कसं चिडीचूप झाले आहे ना.... मला हे करायचे , मला ते करायचे, हे असेच झाले पाहिजे, मला असेच लागते... मला वाटलं म्हणून हे केले. सगळच शांत एका क्षणात... सगळं कडीकुलूप बंद! मग कशासाठी होती ही धडपड.... केवळ कटपुतली आहोत  का आपण? पुन्हा पुन्हा हेच सिद्ध होणार आहे का? ‘आनंद’ चित्रपटमधला famous dialog..बाबू मोशाय... ‘हम सब तो रंगमंच की कटपुतलीया है!’
            If you can’t go out side go inside! अनेकांनी हे या आधी बऱ्याचदा सांगितले. पण ..पण आता ते बहुतेक पटायला लागले असावे म्हणून अनेकांच्या whatsapp status वर झळकत आहे. मानवी जन्म लाभला आहे हो मला. भूक, भय, निद्रा, मैथुन या चार गरजा मला प्राणी या जगतात स्थान देतात. but...m gifted one! माझी बुद्धी..मला मिळालेली ही देणगी मला कालपरवापर्यंत उच्च स्थान देत होती. मला पडणारी स्वप्ने मला स्वस्थ बसू देत नव्हती. शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य या नवरसांनी मी नटत होतो. माझे भविष्य लिहिण्याचा आणि घडविण्याचा अविरत प्रयत्न करत होतो. नजर केवळ भविष्याचा वेध घेत होती. तिथपर्यंत पोहचायचे आहे. त्यासाठी हा protocol. तो continuously follow करायचा. हा कोरोना येईपर्यंत या दिनक्रमात काहीच fault नव्हता. आम्ही आनंदी होतो, सुख दुःख जसजशी येत होती त्याला सामोरे जात होतो. आम्ही जगत होतो.
            पण आता... एका क्षणात सगळे statue ! भविष्य नेहमीच अंधारात असते हे पटायला लागले.
आपण नेमके का जगत आहोत? या जन्माचा काय नेमका हेतू? हे प्रश्न आता पडायला लागले आहेत. आपला survival factor नेमका काय आहे? आजचा दिवस माझ्या आयुष्यात आला आणि हा दिवस मी नेमका कसा जगत आहे? कामासाठी मी आहे की माझ्यासाठी काम आहे? जगण्यासाठी जी जी आवश्यक कौशल्ये असतात ती मला माझ्या शाळेने, कुटुंबाने, परिस्थितीने  दिली आहेत का? परिस्थितीला तोंड देण्याची भावनिक, आर्थिक कुवत माझ्यामध्ये आहे का? माझी मानसिक आणि शारीरिक क्षमता यांचे लागेबंध आहेत का? या सर्वांची उत्तरे शोधण्याची ही वेळ आहे. उत्तरे जर “नाही” असतील तर मी केवळ परावलंबी आहे... हातात असलेला वेळ ही उत्तरे “हो” कशी करता येतील यावर काम करण्याचा आहे असे नक्की वाटते.
            हे lockdown कधी संपेल आणि काय याचा जर सतत विचार करत राहिलो तर पुन्हा पुन्हा तीच चूक करू... अंधारात असलेल्या भविष्यासाठी आधी शरीराची तगमग केली आता मनाची घालमेल करू. खूप प्रश्न आहेत. खूप... नोकरी टिकेल की नाही, व्यवसायाचे काय होईल? घराचे, गाडीचे हप्ते या प्रश्नापासून आज संध्याकाळी जेवण मिळेल की नाही इथपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्न निर्माण झाले आहेत. आज account ला पैसे आहेत पण खर्च कुठे करायचा हा प्रश्न आहे आणि दुसरीकडे सरकार मदत देऊ करत आहे पण माझ्याकडे account च नाही असे प्रश्न आहेत. सगळेच जण एका स्तरावर आलेले आहेत. आयुष्य टिकवायच आहे... बस... सर्वांची एकच इच्छा!
सध्या दुसरा दिवस आपल्या आयुष्यात येणे हाच बोनस असणार आहे.
शाळेत हसरी बोल फुले काव्य संग्रहच्या निमित्ताने नवा दिवस ही मंगेश पाडगावकर यांची विश्वास जागवणारी कविता वाचनात आली. सध्या साहित्य वेगवेगळ्या स्वरुपात इतके भेटीस येत आहे की आपल एवढे वाचन राहिले होते हा प्रश्न  पडावा. प्रत्येकाला काही ना काही सांगायचे आहे. पण ऐकणारा समोर नाहीये. मग त्याला अनेक माध्यमातून मी सांगत आहे, त्याचे ऐकत आहे. मला जगण्यासाठी हे संभाषण आवश्यक आहे. मला हितगुज करायचं आहे, ते ऐकणार, समजून घेणार कोणीतरी हवं आहे.  मग ते सार्थ तत्वज्ञान असो किंवा वायफळ बडबड असो, हे संभाषण मला हवे आहे. इतके दिवस ज्या मोबाईलला सगळे दोष देत होते, तोच आज तारणहार म्हणून मदतीला आला आहे. ज्ञान, मनोरंजन, भाव सगळी गरज तो भागवत आहे.
हेच सगळे दृष्टिकोनातील बदल घडत आहेत.. स्वतःमध्ये होणारे बदल अनुभवा. हा दिवस, हा क्षण मी कसा घालवत आहे हे बघा. मज्जा येते. एक वेगळा आनंद असतो. मी बदलत आहे हे आपलं आपल्याशी एक गुपित आहे. “बदल अपरिहार्य असतो’ या बदलाचे आपणच आनंददायी साक्षीदार या वर्तमान घडीला होऊया.
            कोणताही बदल आचरणात आणायचा असेल, कोणतीही गोष्ट सवयीची व्हायची असेल तर ती किमान 90 दिवस करावी लागते. चीनचा lockdown 90 दिवसांचा होता. घरात राहणे हे सवयीचे होऊ लागले तर? आज जसे घरात राहणे त्रासाचे तसे उद्या बाहेर पडण्याची वेळ आली तर ते त्रासाचे होऊन कसे चालेल?
            आपल्याला आपला survival factor सक्षम बनवता आला पाहिजे. जो मला परिस्थिती समोर उभे राहण्यास मदत करेल. परिस्थितीनुसार माणूस बदलतो. त्याला बदलावे लागते. तर आणि तरच तो तग धरू शकतो. पण हा बदल जेवढ्या लवकर स्वीकारला जाईल तेवढ्या लवकर वर्तमान सुकर, सुसह्य होत जातो. याच भूमिकेतून  भविष्य पण कधीतरी वर्तमान होणारच आहे की. तो वर्तमान पण तितकाच सुकर, सुसह्य होईल.  
            आजचा क्षण साठवूया... समृद्ध करूया... तोच शिदोरी म्हणून साथ देणार आहे. 

Wednesday, 1 April 2020

फेरफटका


Scene १
       'अभिषेक, ए  अभिषेक उठ बरे... ५.३० वाजून गेले ..उठ बर..मी किचनमध्ये कधी जाऊ? सगळा वेळ तुला उठवण्यात जाईल ..उठ पटकन... आगाशे काका वेळेत येतात...चांगलं वाटतं का त्यांना वाट पहायला लावण .... झाली दिवसाची सुरुवात....तीन डब्यांमध्ये काय काय दिले ....कोणता पदार्थ आवडीचा आणि त्याच्या बदल्यात कोणता पदार्थ compulsory खायचा याची आठवण करून देऊन वेळेत रिक्षा गाठली...
       चला आता मस्त गाणी ऐकत ४ फेऱ्या माराव्या...दिवस माझा करून घ्यायचा असेल तर हा musical dose must आहे. चालताना आपण एकटे असल्याचा फील न येता आपण आपल्या विश्वात राहिल्याचा फील देतात ही गाना वरची गाणी... वा दिन बन गया....ओ लडकी beautiful......दिवसभर हे गाणे आता गुणगुणायला मोकळी...
Scene २
       ओ ...अहो.. नाष्ट्याला पोहे....चहा रेडी आहे.... डबा घ्यायला कोणाला पाठवणार आहात...अभिषेक ३.१५ वाजता सुटेल..कोण घ्यायला जाणार आहे. वेळेत पाठवा... नाहीतर हे पोरग मला call करत बसतं...मी तासावर असते ..फोन नाही घेऊ शकत...
       माई चहा झाला आहे... हा कोणी प्रसाद दिला आज? तुमच्या योगासनाला बर आहे..देवदर्शन चालू असतं सतत कोणाचं तरी...यावेळी कक्कर aunty की देसाई काकू....आज दोडक्याची चटणी आणि मटकी करते...
तोपर्यंत कानावर हाक....”कुठे आहेत अण्णा?” “काय काका जिम ला जाऊन आला का?” स्मिता madam मस्तपैकी आल्याचा चहा करा...डॉक्टर काका आले आहेत. इति अण्णा... हो अण्णा ....इति मी ...
       “ताई आम्ही आलो ....” “धन्यवाद ...तुम्ही घरात येईपर्यंत माझा जीवात जीव नसतो....” “अहो ताई येणार म्हणजे येणार”....लई काळजी करता... बर किती चपात्या किती भाकरी... सांगा पटापट....इति आमच्या दोन्ही मावश्या....
       “माई थोडं परीक्षांची काम सूरू आहेत , यायला उशीर होईल....येते मी ..अभिला जास्त झोपू देऊ नका....”
Scene ३
       ९५ बिग FM वर मस्त गाणी... जुनीपुराणी .... माहोल बन गया... देवा.. हे चौकातले रिक्षा वाले कधी सुधारायचे...फूट पाथवर टू व्हीलर... आवारा ... या बसेस तर ... त्यांच्यासाठी separate रोड, separate सिग्नल..तरिही हा असा performance ... भगवान उठा ले रे ..उठा ले...
       मातोश्रीकडे चक्कर मारावी आज जरा...कालच आल्या आहेत गावावरून... मनुताई एक कप चहा? ...बाबा फक्त चहाच...आईला सांगा उपाशी निघालेली नाहीये घरातून ..उशीर झाला आहे... आई, ताई फक्त तुम्ही आल्यावरच येतात ..इति स्नेहल आणि श्रीकांत .... मनू चल शाळेत आपलं तू माझ्याबरोबर ...आत्तुला सगळे रागावतात ..तूच माझी चल....
आज बाहेर बऱ्याच गाड्या दिसत आहेत...मनोहर मध्ये काही कार्यक्रम की पालक बैठका....hi मिस करणारी ही पोर... नुसतं म्हणायला शाळा ११-६ ..सकाळी ९/१० वाजल्यापासून शाळेत रमतच असतात ...ग्राउंड भरलेले बघायला मज्जा येते... हे शंभू सर ग्राउंड नुसते स्वतःचे करून टाकत असतात...आज मातृमंदिरमध्ये गुरुकुलाचा कार्यक्रम आहे वाटतं..बरीच तयारी सूरू आहे...गाडी लावायला जागा मिळाली ..hushhh
Scene ४
good morning लोलिता...कशी आहेस... आज आमच्यासाठी काही bulletin चा खाऊ.... “विद्यामिसने दिला की आणतेच” “धन्यवाद madam....चला दिवस सूरू झाला आमचा आणि तुमचा पण....” माणसांच्या की टेबलवरच्या कागदांच्या गराड्यात असणाऱ्या शिवराजदादाचे दर्शन झाले....आमच्या डोक्यातील विषय मांडायला कधी वेळ होणार कोणास ठाऊक? शीतल ताईच किती वेळा व्यासमुनी व्यासमुनी करत येऊन गेली आहे... असो..
वा..इतनी शक्ती हमें दे ना दाता...आपली आवडती प्रार्थना... कर दे पावन हर इक मन का कोना.... मस्त म्हणाल्या मुली...विद्या मिसचे विद्यार्थ्यांचे कौतुक करणारे निवेदन...वावा यावर्षी भरपूर बक्षिसे झाली ..मस्त
दाराशी वाट बघणारे आर्या, ज्ञानेश्वरी, श्रीपाद, डेस्क च्या बाजूला बसणारे श्रुती, अथर्व , सई, ओरडणी खाणारे प्रणव, वेदांत हांडे, आत्रेय, आभोणकर, फिसिफिसी हसणाऱ्या प्राप्ती, ऋतुजा ...लक्ष देऊन ऐकणारी सृष्टी, ओजस्वी... सगळेच माझे.... काहीही बोला... मिस म्हणत बिलगायला येतातच...
हा आख्खी शाळा फिरणारा प्रथमेश नारळे आणि कृष्णा मोटे, तासाला जस काही मला उचलून घेऊन जायचं आहे अशा आवेशात तासाला बोलवायला आलेले श्लोक, सार्थक आणि प्रसाद, स्टार मिळविण्यासाठी मागे लागणारे सिद्धी, आकांक्षा, शौर्य, गंधार, तासाला आपल्याच धुंदीत असणारा ओम, शिव, शिवम...
मिस तुम्ही सांगा हो फक्त ..करतो असे म्हणणारी विस्मया, काहीना काही सांगायची चिमट असणारी वैदेही, सांज, वसुंधरा, उत्तरे बरोबर आली किंवा चुकल्यावर चेहऱ्यावर भाव उमटवणाऱ्या सृजा, आर्या, सृष्टी, मृदुला , राधिका.... अरे सगळ्याच बोलक्या.... गोंधळ न घालता चेहऱ्याने बोलणाऱ्या माझ्या लेकी, प्रश्नांचे भांडार असणारा ईशान, कपाळावर आट्या असणारा शिवांग, डोळे मिटून दूध पिणारा शाश्वत आणि अपूर्व, याच्यावर रागवावं की हसावे असा माझा गोंधळ करणारा स्वराज... कसेही असेनात का ..मनापासून ऐकतात माझ... भारी वाटतं...वर्गाचा कोपरा न कोपरा बोलका असतो...
Scene ५
“जेवायला कोण कोण येत आहे? मला भूक लागली आहे...मी सुरुवात केली आहे ....माझा नंतर तास असतो....” आलोच ताई ...एक मिनिट....जिना चढत आहे.... तुम्ही बसा ...माझी एक meeting आहे आत्ता...श्रीराम, अवधूत, आदित्य, अस्मिता, गायत्री, प्रियांका, कल्पेश  आणि मजल दरमजल करत येणारी आरती...अवधूतचा गरमागरम डबा आणि आजची भाजी ओळख...मेथी की तांदुळाचा...असा तोंडी लावायला प्रश्न आरतीचे चारचार डब्बे.... श्रीराम च्या collection मधले हटके गाणे आणि दिलखुलास गप्पा....एकदम स्वच्छंद .... सोयाबीन ते आगगाडीच्या डब्यापर्यंत यथेच्छ विहार...मध्येच प्राचार्यांच्या  ऑफिसमध्ये असणारा दहावीचा  बोर्ड सगळेजण वाचून येतात....आणि all is well म्हणत म्हणत डबा संपवतात...
Scene ६
असाच दिवस उतरणीला लागायला लागतो...देवळेकर सरांच्याकडे जायचे तर आधीच waiting ला चार जण दिसलेले असतात....ऑफ तासाला bulletin असतं किंवा पेपर टायपणं असतं किंवा अकारिक तपासणी ...किंवा कार्यशाळा काम, वृत्त लेखन, फोटो संकलन  किंवा ppt बनवणे आणि हे काही नसेल तर कधीकाळी घेतलेली उचल ..त्याचा हिशोब पुरा करणे असतेच किंवा etech माहिती पुरवणे किंवा याद्या print काढून देणे हे तर असतेच असते. येता जाता समाधान दादा ... ताई आपल्याला हे करायचं आहे बर का.... मस्त करू आपल्या विभागाचं.... असं सुचवण असतं... कामथे सर, वर्षा ताई, आंबेकर मिस, दीपाली ताई, स्वाती ताई, सुपे ताई, सीमा ताई,श्वेतल ....हे झाले का....ते झाले का.... जरा म्हणून उसंत नाही.....पण मस्त कामे झाली आजची....दादाला reporting..... स्वाहा .... झाले...केले....करत राहणार.....

Scene ७
हे सगळ करायचं म्हणजे energy ड्रिंक ..चहा तर हवाच.... त्याशिवाय का हे शक्य.... घंटा वाजायच्या आत मन स्वयंपाक घरात गेलेले असते नाही तर चाय अड्डावर पोहचलेले असते...कसं सुचत जात मस्तपैकी...चहाचा एकेक घोट घेता घेता....
संपला दिवस....पोहचलो घरी.... लेकाचे reporting....एक मस्त पडी.... आवराआवरी.....आणि उद्याची तयारी.....
अरे उठले की ....परत....पण काय .... सकाळचे सात वाजले...५.३० नाही....काही घाई नाही गडबड नाही.... एकदम निवांत ....अग, मन वेगाने धावत फेरफटका मारून आलेले आहे.... तू निवांत विश्रांती घे आत्ता.... तुझ्यानुसार चाल... इतके दिवस घड्याळाबरोबर पळत होतीस....


Saturday, 21 March 2020

मृत्यु दाराशी येता......

श्वासाचे गणित मांडूया ......
            अनेक msg चा धुमाकूळ...म्हणजे कोरोना जेवढ्या लवकर replicate होत नसेल त्यापेक्षा लवकर msg चा फॉर्म बदलत आहे. विनोद, विनंती, आवाहन, समज, दाखले, आदेश, स्वतःच ideal role होणे, स्वनिर्मिती  अशा एक ना अनेक स्वरुपात माणसाची प्रगल्भता दिसून येत आहे. कधी ना कधी मरण येणार.... प्रत्येकजण यासाठी so called mentally prepared असतो. अज्ञानात सुख असते. क्षण कोणता असेल माहित नाही. 
            आत्ताची परिस्थिती फक्त तो क्षण कदाचित हा असू शकतो ....असे सांगणारी आहे. हे वर्ष तसे असे क्षण अनेकदा दाखवून देणारे होते. पावसाळ्यातील पूर परिस्थिती असो, ऑस्ट्रेलिया मधील वणवा असो किंवा वूहान मध्ये जन्माला आलेला आणि सर्व जगाने पोसलेला हा कोरोना असो. हे क्षण वरचेवर आले आहेत आणि या क्षणामधून निभावलो तर पुढे असे अजून क्षण असतील. क्षण चुकणार नाहीये... सासऱ्यांनी सांगितलेली एक गोष्ट आहे .. गरुडाच्या पाठीवर एक मुंगी क्षण चुकवायला हिमालयात गेली होती. नंतर समजले तिचे मृत्यूचे स्थानच हिमालय होते. 
      तरीही लढा द्यायचा आहे. हतबलता स्वीकारायची नाहीये. सगळ्या शास्त्रज्ञाच्या मांदियाळीत मला डार्विन नेहमीच भावतो. कोणतेही आयुष्य जगत असा त्याची Theory of Natural Selection प्रत्येक ठिकाणी लागू. Struggle for existence and Survival of fittest. तावून सुलाखून जो निघतो तो सर्वोच्च पदी जातो आणि टिकतो. त्याची पिढी टिकते.
            सध्याची लढाई केवळ स्वतः टिकण्याची नाहीये तर पिढीला टिकविण्याची आहे. कथारूप वाटणारे आपले आईवडिलांचे अनुभव....७२ चा दुष्काळ पडला होता ना तेव्हा....किंवा चीन भारत युद्ध असो किंवा बांग्लादेश युद्ध असो त्यांचे अनुभव “आम्ही कसे दिवस काढले”....या tagline ने सूरू होतात आणि आपल्याला ते कथारूप वाटून आपण त्यात रमतो. आज ही tagline “आपल्याला असे दिवस काढायचे आहेत”..... या मध्ये रुपांतरीत झाली आहे. काही वर्षांनी नक्कीच ती कथारूप होईल पण ती कथा सांगायला आपण असू की नाही याची शाश्वती नाहीये....
            मज्जा अशी आहे की मरण हे परीक्षा घेत असते. यावेळेस दाराशी आलेले हे मरण थोडेसे विक्षिप्तपणे वागत आहे. मरणच ते थोडा विक्षिप्तपणा असणार.... मरणाचा लढा वगैरे बघून आता त्याला सुध्दा बहुतेक बोअर झाले आहे. त्याला आता मानवाचा त्रागा बघायची इच्छा नाहीये. ती धावपळ, ओढाताण, स्ट्रेस, हेवेदावे, हे सगळ बघून त्यालाच frustration आले आहे बहुतेक. म्हणून त्याने आ वासला आहे..... आई जशी मुलांना म्हणते ना एका जागी स्थिर बैस नाहीतर माझ्या इतकी वाईट नसेल.... मरण सध्या त्या फॉर्म मध्ये गेले आहे. म्हणत आहे की फक्त एका जागी शांत बस.....फक्त शांत बस.... त्याला सुध्दा कामातून जरा विश्रांती हवी आहे. accidents, वासना, स्ट्रेस, प्रदूषण कित्ती कित्ती कारण या मरणाची! सध्याची परिस्थिती बघून कोरोना शिवाय बाकीची मरणाची कारण होती की नाही कधी हा प्रश्न पडावा......
            LOCKDOWN ! काय lock down झाले आहे नेमकं? अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. बातम्यांमध्ये एक ओळ दिसते. फक्त जीवनावश्यक वस्तू सूरू राहतील.... जीवनावश्यक.... मग हाताच्या बोटावर मोजण्याइतकी दुकाने. तिथे सुद्धा आता १५ मिनिटापेक्षा जास्त नको थांबायला....काय आहे माझ्या जीवनासाठी आवश्यक ? हे शोधण्याचा हा सामुदायिक काळ.... कदाचित सगळ्यांना एकत्रितपणे आणि एकच उत्तर मिळाले तर उरलेले आयुष्य (अजूनही..आशानाम मनुष्याणां....)सुखकर होईल.
            आपलीच पिढी आहे जी ही कथा पुढच्या पिढीला सांगताना त्याला अध्यात्माची योग्य जोड देऊ शकेल. आज तंत्रज्ञान नसते तर ही जागृती करणेही सोप्पे नव्हते. त्यामुळे तंत्रज्ञानापासून दूर असलेले आज अनेकजण त्याचा वापर करून Social distancing मध्ये पण आपलेपणा शोधताना दिसत आहेत. आणि नेमके कशासाठी पळत आहोत याचा विचार सुध्दा करायला वेळ नसणारे आज जरा स्थिर होता येत आहे का किंवा आपल्याला सुध्दा स्थिर होता येऊ शकत या विचाराने अचंबित आहेत.
            जरा विसावू या वळणावर ...असं म्हणत असताना थोडा लेखाजोगा मांडू या का? मित्रमंडळीमध्ये आपण काय काय करत असतो, काय काय केले, कसं कसं करत आहोत, असं अगदी न थकता सांगत असतो. हा लेखाजोगा जरा स्वतःला सांगू या....खरंच डार्विनच्या सिद्धांतानुसार जगलो का मी .... जो जो काही struggle होता तो माझ्या अस्तित्वासाठी होता का .... काय राहून गेलं ...एक ब्रेक मिळाला आहे ..त्यात ते पूर करता येइल का? आत्तापर्यंत करत असलेलं सगळच निरर्थक का....की त्याचे या समाजात किती योगदान देता आले या सगळ्याचाच लेखाजोगा मांडू या.
            break हवा break हवा असं म्हणत असताना नवेनवे destination शोधत असतो. निसर्गाने आज कदाचित जाणीव करून दिली....तुझ घरपण एक destination आहे. तिथे सुद्धा नवरसाची विविध रूपे आहेत. त्यांना पण जरा अनुभव. आणि तू स्वतः या निसर्गाचा घटक आहेस. स्वतःला अनुभव. तुझ्यामधले सौंदर्य शोध. आणि ते फक्त स्वतःला सांग....
            मृत्यु दाराशी येता एवढा शांत संवाद तुझ्यामधील ईश्वराशी करता येत असेल तर त्याशिवाय दुसरं सुख काय..... भेटूच....या अशा कथा सांगायला...यया बद्धा प्रधावन्ति.......